अभंग.
प्राप्तीवीण फळ केवीं लाहेप्राणी ।
जैसा चातक धरणीं उपवासु ॥ १ ॥
ओळलिया मेघु सावधु बोभाये ।
बिंदुमात्र घेई जीवन देखा ॥२॥
तैसें केवीं घडे संसारिया चित्ते ।
प्राप्तीच्या अर्थातें साहें संत ॥३॥
सगुण निर्गुण समरस आहे ।
विरुळा येथ साहे समता बुद्धी ॥४॥
जंववरी समान शांती बुद्धी हे ठेली ।
तंववरी ये भुली बोली कैसी घडे ॥५॥
दिन काळ पळपळ स्मरणनामाचें ।
विरुळा या मंत्राचे करी पठण ।
ज्ञानदेव म्हणे नामया हे तूं गा जाणसी ।
भजन केशवांसी तूंचि तुझा ॥६॥
★भाव★
पृथ्वीला स्पर्श केलेले पाणी चातक पक्षी सेवन करीत नाही. तो मेघांतून पडणाऱ्या पाण्याचेच सेवन करतो. मेघातील पाणी मिळेपर्यंत त्याला पाण्याचा उपवासच घडतो.१. जेव्हा मेघ वृष्टी करण्याकरिता वळून येतो तेव्हा तो चातक पक्षी मेघाचे बिंदुमात्र पाणी सेवन करण्याकरिता अतिशय सावध असतो.२.तद्वत संसार
तापाने तप्त झालेल्या पुरुषाच्या चित्तात संतांच्याकडून आत्मज्ञान मिळविण्याची तीव्र इच्छा कशी व केव्हा होईल कोण जाणे.३. सगुण व निर्गुण रुपाने परमात्मा सर्वत्र आहे. पण त्याची व्यापकता समजन घेणारा क्वचितच ४. अशी परमार्थाची बुद्धी नाही. तोपर्यंत सर्व गोष्टी निष्फळ आहेत. ५. रात्रंदिवस नाममंत्र घोकणारा विरळा आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,हे नामदेवा भगवंताला भजन आवडते. हे आपणास ठाऊक आहेच.६.
*_🙏॥राम कृष्ण हरि॥🙏_*

No comments:
Post a Comment